सुलतानपुर दि. १२ (प्रतिनिधी) – सुलतानपुर येथील सुपरिचित, सुस्वभावी व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले आत्माराम आनंदा देशमाने (वय ५६) यांचे गुरुवारी संध्याकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच सुलतानपुर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
देशमाने हे शांत, साधे आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून गावात ओळखले जात होते. कोणाच्याही अडचणीच्या वेळी धावून जाणारा, मदतीचा हात पुढे करणारा असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे गावातील अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबीयांसह मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार उद्या शुक्रवार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता सुलतानपुर येथील हिंदू स्मशानभूमीत करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विजय व एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Post a Comment
0 Comments